राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात   

पुणे : येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना भराव्या लागणार्‍या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली आहे. आता राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
 
मागील वर्षीपर्यंत पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या विभागांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत होती. तर उर्वरित राज्यात पारंपरिक पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरच प्रवेश देण्यात येत होते. मात्र, येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्वत्रच अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची कार्यपद्धती, नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार १९ ते २८ मे या कालावधीत विद्यार्थी नोंदणी, महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरता येणार आहेत.
 
गेल्यावर्षीपर्यंत ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे नोंदणी शुल्क मुंबईसाठी वेगळे आणि उर्वरित विभागांसाठी वेगळे होते. त्यानुसार मुंबईसाठी २२५ रुपये, तर उर्वरित विभागांसाठी १२५ रुपये शुल्क आकारण्यात येत होते.
 
मात्र, आता येत्या शैक्षणिक वर्षापासून राबवल्या जाणार्‍या राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे आता या नोंदणी शुल्कात कपात करण्यासह सुसूत्रता आणण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी, पालकांचीही काही प्रमाणात आर्थिक बचत होणार असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles